ताज्या बातम्या
आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर विभागातून 225 जादा एसटी बसेस; 40 भाविकांवर गावातून थेट पंढरपूरला बस
By Shivani - 7/15/2026 12:37:16 PM
Share This News:
आषाढी यात्रेसाठी मोठा दिलासा! कोल्हापूर विभागातून 225 जादा एसटी बसेस; 40 भाविकांवर गावातून थेट पंढरपूरला बस
कोल्हापूर :
आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूर विभागातून 20 ते 30 जुलै या कालावधीत पंढरपूर यात्रेसाठी 225 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, 25 जुलै रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या यात्रेत वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतुकीचे सविस्तर नियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी आगाऊ आरक्षण करून बसची मागणी केल्यास, त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा परतीच्या प्रवासासाठीही लागू राहणार असल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या सर्व प्रवासी सवलती आणि विविध योजनांचा लाभ भाविकांना मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर पात्र प्रवासी आपल्या लागू असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन पंढरपूर यात्रेचा प्रवास करू शकणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी आगाऊ आरक्षण करून या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून बस आरक्षण आणि वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने एसटी महामंडळाने अतिरिक्त बस सेवा सुरू करून यात्रेकरूंच्या प्रवासाची विशेष व्यवस्था केली आहे.
Pandharpur Yatra
|