ताज्या बातम्या
आजरा साखरची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
By nisha patil - 9/26/2025 11:12:49 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- आजरा तालुक्यातील गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शांततेत व सुरळीत संपन्न झाली. सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै. वसंतराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तर उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश देसाई यांनी केले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा ठराव संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी मांडला. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई हे होते.
स्वागत करताना व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती दिली आणि भागातील शेतकऱ्यांच्या बरोबरच कार्यक्षेत्राबाहेरील सतत जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचा यावेळी प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी अध्यक्षीय भाषणात व मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या कामकाजाचा आढावा सादर केला. त्यांनी यावेळी म्हटले की, आजरा तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील हा साखर कारखाना अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नाम. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हा कारखाना सुरु आहे. कारखान्याची गाळप क्षमता आणि ऊस उत्पादन यांची सांगड घालताना, इतर कारखान्यांची स्पर्धा, शेतकऱ्यांची लवकरात लवकर ऊस पाठवण्याची मानसिकता त्यामुळे गाळपावर परिणाम होताना दिसते. यासाठी गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न झाले.
अतिपावसामुळे ऊसाचे घटणारे उत्पादन आणि ऊसाची पळवापळवी यामुळे गाळप उद्दिष्ट साध्य होत नाही. एन. सी. डी. सी. सारख्या प्रस्तावामुळे कारखान्याला फायदा होणार आहे. सायलो सिस्टममुळे उत्पादन खर्चात काही प्रमाणात बचत होणार आहे. सर्व सभासदांनी शेअर्स रक्कम पूर्ण करून सहकार्य करा म्हणजे सलग वर्षी साखर देता येईल.
भविष्यात सी. एन. जी. प्रकल्प सुरु करण्याचा मानस असून त्यापद्धतीने काही कंपन्याशी चर्चा सुरु असल्याचे संगितले. अहवालामध्ये नाम. आबिटकर, आम. सतेज पाटील, आम. शिवाजी पाटील यांचे फोटो नजर चुकीने राहून गेल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
मागील वर्षीचा इतिवृत्तांतचे अनिल देसाई यांनी वाचन केले तर विषय वाचन कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी केले. ताळेबंदाबाबत शंकेचे निरसन चीफअकाउंटंट प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी माजी संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी जे 2700सभासदांचे सभासदत्व रद्द झाले आहेत त्यांना योग्य न्याय देण्याची मागणी केली. एकतर त्यांना सभासदत्व द्या नाहीतर त्यांची रक्कम परत द्या अशी मागणी केली.
शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी मागील वर्षीच्या एफ.आर. पी. बाबत विचारणा केली त्याचप्रमाणे ताळेबंदाबाबत शंका व्यक्त केली. सुनील शिंदे यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांनाही साखर द्यावी अशी मागणी केली त्याच बरोबर कारखान्यातील चोरीचं काय झाले? जे संशयित होते त्यांना कामावर घेतले गेले मग चोर कोण? असाही प्रश्न उपस्थित केला. कॉ. संपत देसाई यांनी तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण होऊनही तालुक्याला सिंचनासाठी वापर होत नाही त्यामुळे ओलिताखाली भाग येत नाही. अजूनही 76%शेती विहिरीच्या पाण्यावर असल्याने या प्रकल्पांच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करावा असे सांगितले. माजी चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी सायलो बाबत प्रश्न उपस्थित करीत त्यामुळे साखरेचा दर्जा खालावला असल्याचे सांगितले. संजय देसाई यांनी म्हटले की, मयत सभासदांचे वारस नोंद करून घ्यावेत.
कारखान्यात प्रत्येक वर्षी चेअरमन, शेतीधिकारी, कार्यकारी संचालक नवीन येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले प्रश्न व अडचणी नेमके मांडायच्या कोठे असा प्रश्न उपस्थित होत असल्याबाबत सांगितले. याचबरोबर उदय कोडक, युवराज पोवार, संपतराव सांगले आदींनीही प्रश्न विचारले.शेवटी आभार संचालक मारुती घोरपडे यांनी मानले.
यावेळी वसंतराव धुरे,विष्णुपंत केसरकर, उदयसिंह पोवार, सुधीर देसाई, मधुकर देसाई, अनिल फडके, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरिभाऊ कांबळे, नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, दिगंबर देसाई, शिरीष देसाई, डॉ. रोहन जाधव, दिनेश कांबळे,हसन शेख तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, तोडणी वाहतूकदार, उसपुरवठादार, ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अहवालात नाम. आबिटकर यांचा फोटो नसल्याने आणि ताळेबंद साफ चुकीचा असल्याने शिवसेना शिंदेगटाने सभेवर बहिष्कार टाकत निषेध नोंदविला
आजरा साखरची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
|