बातम्या
5ऑक्टोबर पर्यंत बैठक न झालेस वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढणार -शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीचे अल्टीमेटम
By nisha patil - 9/20/2025 11:31:34 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- गेली वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष जीवघेणा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येकजण आयुष्यभराचे अधू आणि अपंग झाले आहेत. जंगली प्राणी शेतात घुसून पिकांची मोठ्याप्रमाणात नासधूस करीत आहेत.विविध मागण्यासाह वेळोवेळी निवेदने व चर्चा झाली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसलेने 5ऑक्टोबर 2025पर्यंत मुख्य वन संरक्षक व उपवनसंरक्षक यांचेसोबत बैठक न झालेस सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढणार असलेबाबतचे शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीने वनविभागास निवेदन दिले आहे.
जंगलालगतच्या कांही शेतकऱ्यांनी तर शेतात पिक घेणेच बंद केले आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मोर्चे, आंदोलने झाली आहेत. पण वन विभागाकडून मात्र कांहीही ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही.
निवेदनात विविध मागण्या करीत म्हटले आहे की, यापूर्वी आजरा येथे मुख्य वनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्यासोबत बैठका होऊन कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याचे ठरले पण कांहीच पुढे सरकत नाही. वरील प्रश्नातील कांही मुद्दे हे मुख्यवनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांच्या अधिकार कक्षेतील आहेत तर कांही मुद्दे हे धोरणात्मक आहेत. त्यासाठी दोन बैठका होणे आवश्यक आहे. मुख्यवनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांचेसोबत प्राथमिक बैठक होऊन मंत्रालय स्तरावरील चर्चेसाठी टिपण तयार होणे आवश्यक आहे. त्याची चर्चा २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत झाली होती. पण ती बैठक अजून झाली नाही. तरी आपण याबाबत पुढाकार घेऊन वरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेच्या मनात याबाबत तीव्र असंतोष आहे. यापूर्वी वनविभागाला इथल्या शेतकऱ्यांनी अनेक निवेदने दिली, मोर्चे आंदोलने झाली, चर्चा झाल्या पण ठोस उपाययोजना मात्र होतांना दिसत नाहीत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात म्हणजे ५ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत मुख्यवनसरंक्षक, उपवनसंरक्षक यांचेसह आजरा येथे बैठक न झाल्यास आपल्या कार्यालयावर तालुक्यातील शेतकरी मोर्चा घेऊन येतील असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉ.संपत देसाई संजय सावंत, प्रकाश मोरुस्कर, कॉ.शांताराम पाटील,दशरथ घुरे रवींद्र भाटले, बयाजी येडगे, काशिनाथ मोरे,भीमराव माधव, नारायण भडांगे,बाळू जाधव,
अमानुल्ला आगलावे,, चंद्रकांत जाधव, विष्णू पाटील, संदीप खोत, श्रावण शेटगे, धनाजी सावंत आदींच्या सह्या आहेत.
5ऑक्टोबर पर्यंत बैठक न झालेस वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढणार -शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीचे अल्टीमेटम
|