राजकीय

साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल

Objections from more than three hundred and fifty farmers have been filed


By nisha patil - 5/26/2026 4:47:05 PM
Share This News:



साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल

 

आजरा(हसन तकीलदार) - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजरा तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसीलदार आजरा यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना हरकती सादर केल्या. आज सकाळी साडेअकरा वाजता संघर्ष समितीचे कॉम्रेड संपत देसाई व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर पेरणोली, मसोली, एरंडोळ, देवर्डे, वेळवटी, खानापूर इत्यादी बाधित गावातले शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. *एकच जिद्द शक्तीपीठ रद्द* अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आज सादर केल्या.

 

वैयक्तिक हरकती अर्जात आपल्या शेतजमिनीसह या रस्त्यामुळे पाण्याचे निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले जाणार आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले जाऊन जमिनी कोरडवाहू होणार आहेत. पर्यावरणाची न भरून येणारी विपरीत परिस्थिती तयार होणार आहे. शेतकरी तर उध्वस्त होणारच पण याबरोबरच इथला निसर्ग आणि पर्यावरण ही उध्वस्त होणार आहे. कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

 

हरकतीचे अर्ज एकत्र करून गाववार स्वतंत्र याद्या बनवून तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ कारकून त्यांच्याकडे हरकतीचे अर्ज देण्यात आले. यावेळी सुधीरभाऊ देसाई,भीमराव माधव, सर्जेराव देसाई, चंद्रकांत गुरव, किरण गुरव, बाळू जाधव, निवृत्ती कांबळे, दिपाली गुरव, सुभाष देसाई, निवृत्ती फगरे, शंकर पाटील, दिनेश कांबळे, बाळू पाटील, छाया गुरव, शंकर हळवणकर यांच्यासह शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल
Total Views: 125