बातम्या
अवयवदान : मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व
By nisha patil - 12/8/2025 4:41:04 PM
Share This News:
अवयवदान : मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व
जागतिक अवयवदान दिन विशेष – डॉ. राजेंद्र नेरली, अधिष्ठाता, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
१३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयवदानाचे महत्त्व, त्यासंबंधी भीती व गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतर अवयवदानाबाबत सजगता निर्माण करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, डोळे अशा अवयवांच्या दानातून असंख्य रुग्णांना नवजीवन मिळते.
१९५४ मध्ये रोनाल्ड ली हेरिक यांनी आपल्या जुळ्या भावाला मूत्रपिंड दान करून पहिली यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. डॉ. जोसेफ मरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यासाठी त्यांना १९९० मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. जागतिक आरोग्य संघटना व आंतरराष्ट्रीय अवयवदान संस्थेच्या पुढाकारातून २००० च्या दशकात हा दिवस औपचारिकरीत्या साजरा होऊ लागला. यावर्षीची थीम — “Give Hope, Share Life”.
भारतात १९९४ पूर्वी अधिकृत नियंत्रण नसल्याने बेकायदेशीर अवयव व्यापार वाढला. १९९४ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू झाला; २०११ व २०१४ मध्ये सुधारणा करून तो ‘मानवी अवयव व ऊतक प्रत्यारोपण कायदा’ अधिक प्रभावी करण्यात आला.
भारताची सध्यस्थिती (वार्षिक आकडे)
-
मूत्रपिंडांची गरज: अंदाजे १,७५,०००, प्रत्यारोपण: सुमारे ५,०००
-
हृदयांची गरज: अंदाजे ५०,०००, प्रत्यारोपण: सुमारे ३०
-
दररोज सरासरी २० रुग्ण प्रतीक्षेत मृत्यूमुखी
भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. महाभारतातील कर्णाचे कवच-कुंडल दान, गणेशाच्या कथेत अवयव बदल, यातूनही अवयवदानाचे तत्त्वज्ञान स्पष्ट होते.
स्पेन, अमेरिका, पोर्तुगाल येथे मृत दात्यांची संख्या प्रति दशलक्ष ४७ पर्यंत असून भारत अजून पहिल्या १५ देशांत नाही. त्यामुळे जनजागृती ही काळाची गरज आहे.
कोणत्याही धर्म, लिंग, वयाची अट नसून, निरोगी व्यक्ती अवयवदानाची शपथ घेऊ शकते. एक मृत दाता आठ जीव वाचवू शकतो. मृत्यूनंतर इतरांना जीवन देणे — हेच खरे अमरत्त्व.
अवयवदान : मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व
|