बातम्या
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार - मंत्री हसन मुश्रीफ
By Administrator - 3/30/2026 4:54:36 PM
Share This News:
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार - मंत्री हसन मुश्रीफ
ग्राहकांना शून्य वीज बिलासह ...पर्यावरण रक्षणाला लागणार हातभार
मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पानंद रस्ते योजनाही प्रभावीपणे राबविणार
कोल्हापूर दि : 30 संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे.याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली "पी. एम. सूर्यघर योजना" संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रामुख्याने उपस्थित होते .
ते म्हणाले, या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधिताला मोफत मिळेल. अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल. त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल. पर्यायाने,पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल.पी. एम.सूर्यघर योजनेच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री मुश्रीफ म्हणाले , शेतकऱ्यांना शेताकडे ये- जा करण्यासाठी,वैरण व गोठ्यांमधून दूध आणण्यासाठी, बी-बियाणे व खतांच्या वाहतुकीसह काढणी केलेली पिके वाहनांमधून घर व विक्रीसाठी नेण्याकरिता तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसह विशेषत: माता-भगिनी व शाळेला ये जा करणाऱ्या बालकांसाठी पाणंद रस्ते म्हणजे जणू जीवनमार्गच आहेत. या अभियानाचा प्रारंभ कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातून दि. १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करणार आहोत.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील म्हणजेच पर्यायाने त्यांची संमती असेल अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या सहाय्याने पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने शेतकऱ्यांनी आप-आपसातील वाद मिटवून या योजनेचा वापर प्रभावीपणे करावा,असे आवाहन करून दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधितांना न्याय द्यावा असेही निर्देश मुश्रीफ यांनी यावेळी दिले .
तर पाणंद रस्त्याबाबत येथे 8 दिवसांमध्ये दर निश्चिती केली जाईल.तसेच ग्रामपंचायतीकडून या रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली .
चौकट - शेतकऱ्यांच्या शेत - बांधापर्यंत थेट बैलगाडी,ट्रॅक्टर व यंत्र सामग्री पोहचू शकेल असे बारमाही रस्ते निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून यासाठी आपण आपल्या आमदार निधीतून सुमारे 5 कोटी रुपये देणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले .
पाणंदीसाठी १४ योजनांमधून निधी.....!
मुश्रीफ म्हणाले, या अभियानांतर्गत पानंदी शंभर टक्के यांत्रिकीकरणातून होणार आहेत. पानंदी तयार करण्यासाठी सी. एस. आर. सह १५ वा वित्त आयोग, खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जन सुविधांकरीता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांकरीता मिळणारे अनुदान, जिल्हास्तरीय खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, ग्रामपंचायतींचे स्व- उत्पन्न, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी, ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे म्हणजेच 25:15, इतर जिल्हा योजना, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, आदिवासींसाठी नाविन्यपूर्ण योजना यासारख्या विविध १४ शासकीय योजनांतून निधी उपलब्ध होणार आहे.
या आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा सिंगण,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे,भूसंपादन उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख , अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार - मंत्री हसन मुश्रीफ
|