बातम्या
मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रोयोगाचे यशस्वी सादरीकरण
By nisha patil - 10/9/2025 11:36:35 PM
Share This News:
मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रोयोगाचे यशस्वी सादरीकरण
आजरा (हसन तकीलदार):-शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था व चैतन्य सृजन सेवा संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रा. नवनाथ शिंदे यांचे मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद हे एकपात्री प्रयोगाचे चैतन्य सांस्कृतिक सभागृहात यशस्वीपणे सादरीकरण झाले. या एकपात्री प्रयोगामधून प्रश्नोत्तराच्या रूपाने स्वामी विवेकानंद यांचे जीवनाचे पैलू अगदी सरळ व सोप्या भाषेत उलगडत आजच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दृश्य प्रभाविपणे मांडत त्यांच्या क्रांतिकारी विचारामधून माणूस बनण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम या एकपात्री सादरीकरणातून करण्यात आल्याचे दिसून आले.
या एकपात्री सादरीकरणात स्वतः डॉ. प्रा. शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारत त्यांच्याकडून उत्तरे घेत स्वामी विवेकांनंदांच्या जीवनाचे रहस्य उलगडत त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूना प्रेक्षक रसिकासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंदांची कौटुंबिक पार्श्वभूमी, रामकृष्ण परमहंस यांच्याशी गुरुशिष्याचे नाते, लोकमान्य टिळकांची भेट, भाटे वकीलाशी संन्याशाच्या जीवनाचे पैलू; जीवनपध्दती याबाबत झालेली चर्चा, सर्व धर्म परिषदेत मांडलेले घोषवाक्य भाकीत, भारत आणि हिंदुस्तान, तर्कबुद्धी, पंडित श्रेष्ठ की अनुभव श्रेष्ठ, आज आपल्या देशासमोर मुद्दाम पसरवलेला धर्मद्वेष, जातीद्वेष तसेच स्त्रियांवरील अत्याचार, निरर्थक कर्मकांड, शेतकरी आत्महत्त्या असे असंख्य प्रश्न "आ "वासून उभे आहेत यावर स्वामीजी काय उपाय सुचवले असते यावर सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी शिक्षण हे एकमेव उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षणाची व्याख्या नमूद करताना म्हटले आहे की,केवळ भाकरीच्या दोन घासासाठी असंख्य करूण किंकाळ्या ऐकून त्या करूण किंकाळ्यांची दुःख निवारण करण्याचा प्रयत्न होतोय का? अर्थात जे शिक्षण माणसाला जीवन संग्रामासाठी कटीबद्ध करू शकत नाही, जे शिक्षण माणसाच्या मनात दयाभाव निर्माण करू शकत नाही व जे शिक्षण खऱ्या अर्थाने सिंहसाहस निर्माण करू शकत नाही ते शिक्षण शिक्षण या व्याखेस पात्र नाही असा संदेश देण्यात आला आहे. शिक्षणातून समस्यावर मात करीत समतावादी व मानवतावादी समाज निर्माण करू शकेल असेही शेवटी बोध देण्यात आला आहे.
यावेळी आभार प्रदर्शन करताना शिवाजी बिद्रे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या पात्राला एकपात्री साकारणे एवढे सोपे नाही. स्वामी विवेकानंदांचे ज्ञान व तत्वे अथांग असल्याने एकपात्री सादर करणे तितके सोपे नव्हते तरीसुद्धा डॉ. नवनाथ शिंदे यांनी केशभूषा, वेशभूषा सर्वकाही तंतोतंत आणि अभिनयही साजेशे केले आहे त्यामुळे डॉ. शिंदे हे कौतुकास पात्र ठरतात.
यावेळी डॉ. शिवशंकर उपासे, बळवंत शिंत्रे, चंद्रशेखर बटकडली, भरत बुरुड, नागेश भाटी, सौ. पुष्पलता घोळसे, शिरगुप्पी मॅडम, संतोष जाधव, जीवन शेवाळे, शिवाजी सम्राट, परशुराम कांबळे तसेच रसिक प्रेक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रोयोगाचे यशस्वी सादरीकरण
|