बातम्या

कै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत

The Late Anandrao Jadhav Seva Sanstha is a flame lit by freedom fighters


By nisha patil - 8/31/2026 1:35:13 PM
Share This News:



कै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत
       
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
            
संस्थेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात
            
कसबा सांगाव, : कागल तालुक्यातील कसबा सांगाव हे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव आहे. या गावातील कै. आनंदराव जाधव- इनामदार सहकारी विकास सेवा संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था आहे. देशभक्त कै. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी मिळून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या शेतकऱ्यांप्रती कल्याणाच्या भावनेची ज्योत आपण सर्वजण सतत तेवत ठेवूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

              
कसबा सांगाव ता. कागल येथील कै. आनंदराव जाधव- इनामदार सहकारी विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. तसेच; बँकेच्यावतीने पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अनुदान वाटप धनादेशांचे वाटपही यावेळी झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
             
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कै. आनंदराव जाधव इनामदार सहकारी विकास सेवा संस्थेने इमारत बांधण्याचे शिवधनुष्य उचललेले आहे. केडीसीसी बँकेचा अध्यक्ष व या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजना सुरू आहेत. केडीसीसी बँकेच्यावतीने 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना' मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या योजनेमध्ये सहभागी होऊन येत्या २५ ते ३० वर्षांचे घरगुती वीज बिल शून्यावर आणा. ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी ए. आय.  म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता काळाचीच गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांनी यासाठीही पुढे आले पाहिजे. केडीसीसी बँक शेतकऱ्यांना एक पैसाही यामध्ये घालू देणार नाही. त्याला जोडूनच ठिबकसाठी अनुदान योजना आणण्याच्याही बँक विचारात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याची ऊस उत्पादकता एकरी अवघी २५ ते २६ टन आहे. गेल्या हंगामातच जिल्ह्यातील साखर कारखानदारी अवघी ९० दिवसच चालली. 
​                    
यावेळी केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा कांबळे, कागल पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, गटनेते राजेंद्र माने -सर,  माजी सरपंच बाबासो मगदूम, संस्थेचे अध्यक्ष महादेव केसरकर,  उपाध्यक्षा सौ. मीनाक्षी मिरजे, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक गिरीश पाटील, किरण पास्ते,  अजित शेटे, उमेश माळी, अमर कांबळे, रणजीत कांबळे, नेमिनाथ चौगुले, सुभाष खोत, दीपक गंगाई, संभाजी कोपार्डे, डॉ. सुनील मिरजे, रावसाहेब मगदूम, आप्पासाहेब टाकळे आदी प्रमुख उपस्थित होते.
             
कार्यक्रमाचे स्वागत अमोल माळी यांनी केले. प्रास्ताविक गटनेते राजेंद्र माने यांनी केले. सूत्रसंचालन संदीप दाईंगडे यांनी केले. आभार विठ्ठल चव्हाण यांनी मानले.

 


कै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत
Total Views: 14