बातम्या
वेळप्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ होऊ देणार नाही-आजऱ्यात शेतकऱ्यांचा निर्धार, परभणी घटनेचा निषेध
By Administrator - 2/23/2026 3:00:50 PM
Share This News:
वेळप्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ होऊ देणार नाही-आजऱ्यात शेतकऱ्यांचा निर्धार, परभणी घटनेचा निषेध
आजरा(हसन तकीलदार):- परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकरी स्त्री-पुरुषांच्या वर लाठीचार्ज करून बळजबरी आणि अत्याचार करणाऱ्या सरकारचा आजरा येथे निषेध करण्यात आला.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई, काँग्रेसचे संजयभाऊ सावंत, कॉम्रेड संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, कॉम्रेड शांताराम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले की, माती ही आमच्यासाठी मातेसमान आहे. त्यामुळे मातीला हात लावाल तर आमचा शेतकरी तुम्हाला मातीत गाढल्या शिवाय सोडणार नाही. ज्या राजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त ताकीद दिली त्या राजाच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी स्त्री-पुरुषांच्यावर लाठीचार्ज केला गेला. हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे या सरकारने शक्तीपीठ लादण्याचा प्रयत्न अजिबात करू नये.
शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई म्हणाले,शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या वर सरकार अन्याय करत असेल तर ते नेमके कोणत्या विचाराची आहे हे सांगायची गरज नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. ते अदानी आणि अंबानीचे हस्तक बनले आहे. यांना शक्तिपीठ त्यांच्यासाठी करायचा आहे.
यावेळी रवी भाटले, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, भीमराव माधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात झाली.वेळप्रसंगी रक्त सांडू परंतु शेतकऱ्यांना भूमिहीन करून भांडवलदारांची खिसे भरायला देणार नाही असा सुर दिसून आला.
वेळप्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ होऊ देणार नाही-आजऱ्यात शेतकऱ्यांचा निर्धार, परभणी घटनेचा निषेध
|