राजकीय
साखरेच्या दरवाढीवर राजू शेट्टी आक्रमक; ‘साखर घोटाळ्याची सखोल चौकशी करा’, गोडाऊन तपासणीची मागणी
By Shivani - 8/24/2026 2:48:33 PM
Share This News:
साखरेच्या दरवाढीवर राजू शेट्टी आक्रमक; ‘साखर घोटाळ्याची सखोल चौकशी करा’
कोल्हापूर -
साखरेच्या वाढत्या दरावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. साखरेचे दर वाढले असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला असून, ही साखर ऑक्टोबरमध्ये भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. याच काळात साखर कारखाने सुरू झाल्यास बाजारातील दर कोसळू शकतात, अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात साखरेची प्रत्यक्ष टंचाई नसताना अचानक दरवाढ झाली आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्याची आणि दरवाढीमागील कारणांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
‘गोडाऊनमधील साखरेचा स्टॉक तपासा’
दर महिन्याला साखरेचा सुमारे २२ लाख टन कोटा दिला जातो. सरकारच्या आकडेवारीनुसार ४५ ते ४८ लाख टन साखरेचा हिशोब असताना देशात साखरेची टंचाई निर्माण होण्याचे कारण काय, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. काही साखर कारखान्यांनी टेंडर काढूनही साखर विकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
साखर कारखानदार आणि खासगी व्यापाऱ्यांच्या गोडाऊनची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. कागदोपत्री असलेला साठा आणि प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा याची पडताळणी करावी. रेकॉर्डवर नसलेली साखर आढळल्यास ती जप्त करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
‘साखरेचा पैसा काही लोकांच्या खिशात जातोय’
साखरेचे दर वाढवून काही मोजके लोक मोठ्या प्रमाणात पैसा कमवत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. देशात खरोखरच साखरेची टंचाई असती तर नागरिकांना साखर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असती. मात्र साखर उपलब्ध असून केवळ तिची किंमत वाढली आहे, असे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली असतानाही साखर चोरट्या मार्गाने बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये गेली का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. देशाबाहेर साखर गेली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.
इथेनॉल धोरणावरही राजू शेट्टींचा सवाल
इथेनॉल आणि साखरेचा थेट संबंध नसल्याचा दावा करत केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणावरही राजू शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित केला. केंद्राच्या धोरणावर विश्वास ठेवून साखर उद्योगाने इथेनॉलमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गालाही विरोध
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरही राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन जाणार असून त्यातील मोठा हिस्सा बागायती जमीन असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढत असताना, दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे साखरेचा प्रत्यक्ष साठा, बाजारातील उपलब्धता, कारखान्यांची विक्री आणि दरवाढीमागील कारणांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Sugar Price Hike: साखरेच्या दरवाढीवर राजू शेट्टी आक्रमक; साखर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी
|