AI तंत्रज्ञानाचा गाजावाजा, पण शेतकऱ्यांची लूट सुरूच – राजू शेट्टींचा सवाल
राज्य सरकार AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत असतानाच शेतकऱ्यांची काटामारी व रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून लूट सुरूच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. पुण्यात साखर आयुक्तांच्या बैठकीनंतर त्यांनी पवार काका-पुतण्यांच्या मौनावर टीका केली.
राज्य सरकारने AI साठी ५०० कोटींची तरतूद केली असून हा उपक्रम स्वागतार्ह असला तरी कारखानदारांनी गाळप क्षमता वाढवून देखील ऊस क्षेत्र न वाढवल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. न्यायालयाने एफ.आर.पी बाबत निर्णय दिल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात जाणे हे शेतकरी विरोधी असल्याचेही शेट्टी म्हणाले.
AI तंत्रज्ञान जितक्या तत्परतेने कारखान्यांत राबवले जात आहे, तितक्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा शेतकऱ्यांचे शोषण थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.