राजकीय

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Action will be taken if there is no improvement in city cleanliness


By nisha patil - 4/29/2026 3:17:21 PM
Share This News:



शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आज स्थायी समिती सभागृहात सकाळी 10.30 वाजता सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली.

 

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहरातील रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशा स्थितीत संबंधित मुकादम व आरोग्य निरिक्षकांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या प्रभागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल, त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींमध्ये 50 टक्क्यांनी घट होईल. तुंम्ही काम व्यवस्थित केले नाही तर नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागते. आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष भागात फिरती करुन काम करावे असे निर्देश दिले. आठवडयामधील सहा दिवसात आपले काम व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मी आल्यापासून 40 ते 45 कर्मचा-यांची लाड पागे शिफारशी अंतर्गत नियुक्तीच्या फाईल्स निर्गत केलेल्या आहेत. माझी सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही काम इमानदारीने करावे हि माझी अपेक्षा आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल हि आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मुकादमांनीही कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. नागरीकांच्या व सदस्यांच्या तक्रारी ज्या दिवशी कमी होणार त्यावेळी आरोग्याचे काम चांगले झाले असे म्हणता येईल. शहर स्वच्छ व सुशोभिकरण कसे होईल यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. उन्हांळयामध्ये उन खुप असल्याने सकाळच्या व दुपारच्या सत्रात उन्हाळयापुरते कामाचे नियोजन करता येते का हे सर्वांनी सांगावे. यावेळी सर्वानुमते पहाटे 5 ते 1 या वेळेमध्ये स्वच्छतेची वेळ निश्चित करण्यात आली. मी पहाटे कधीही फिरती करुन तपासणी करणार आहे. सध्या 1575 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत आणखीन नविन लाडपागे कमिटीच्या शिफारशी अंतर्गत कर्मचा-यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तावडे हॉटेल ते गांधी नगरचा एरियामध्ये आता आपल्याला स्वच्छता सुरु करायची आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. एक महिन्यात मला स्वच्छतेत बदल दिसला पाहिजे. प्रत्येकाने दररोज 8 तास प्रामाणिकपणे काम केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश दिले. येत्या मे महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत असून, त्यात कोल्हापूर शहराने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. घरोघरी कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग सध्या 57 टक्के असून ते 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य देण्यात आले. यासंदर्भातील अडचणी पुढील सोमवारपर्यंत दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. तसेच फेरीवाल्यांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचेही निर्देश देण्यात आले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.


शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Total Views: 5