शैक्षणिक
जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणार-अमर चव्हाण
By nisha patil - 2/17/2026 3:03:25 PM
Share This News:
जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणार-अमर चव्हाण
आजरा(हसन तकीलदार):- जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्ता पूर्ण बनवण्यावर भर देणार असून सत्ता ही लोककल्याणासाठी वापरण्याचे माध्यम आहे. आणि सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करणार असे प्रतिपादन जिल्हा परिषद नूतन सदस्य अमर चव्हाण यांनी आज आजरा येथे झालेल्या सत्कारसमारंभ प्रसंगी व्यक्त केले. श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने चळवळीने मदत केलेल्या व निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, अमर चव्हाण आणि पं.स. सदस्या सौ.यशोदा पवार यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,खाजगी शाळांचे पेव आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फुटले आहे. या खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा दर्जेदार बनवण्यावर येत्या पाच वर्षात आम्ही भर देणार आहोत. शिक्षणानेच बहुजन समाजाची प्रगती शक्य आहे. त्यामुळे सरकारी शाळा गुणवत्तापूर्ण करण्यावर आमचा भर राहणार आहे.
सत्काराला उत्तर देताना जि.प. सदस्य सुधीर देसाई म्हणाले,आजरा तालुक्यातील जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पाच वर्षे काम करू. आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी जिल्ह्यच्या गटनेते पदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडू. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी भर देऊ असे त्यांनी सांगितले.
शिरीष देसाई म्हणाले,आज आपल्याकडे रोजगाराच्या संधी नसल्याने आपली पिढी पुण्या मुंबईकडे जात आहे त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा त्यासाठी काय करता येईल याचा विचार आम्ही या पाच वर्षात करू.
यावेळी युवराज पवार(उबाठा तालुका प्रमुख), दशरथ घुरे, नारायण भडांगे, भीमराव माधव, मारुती चव्हाण, व्ही.डी.जाधव, युवराज जाधव यांनी मनोगत व्यक्त करून नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला कॉम्रेड संपत देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर कॉ.संजय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संजय सावंत, निसार लाडजी, प्रकाश मोरुस्कर, प्रकाश कालेकर, नामदेव फगरे, सचिन देसाई, कृष्णा सावंत, कृष्णा गुडुळकर, अर्जुन शेडगे, बाळू जाधव, तानाजी मिसाळ, ह.भ.प. गौरव सुतार, मारुती पाटील, कल्पना जाधव, गंगाराम येडगे, सरिता कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणार-अमर चव्हाण
|