राजकीय
हैदरनगरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा-अन्याय निवारण समितीचे निवेदन
By nisha patil - 3/11/2025 1:20:08 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- विविध सामाजिक प्रश्न घेऊन लढा देणारी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली हैदरनगर,आजरा येथे पाणीपुरवठा सुरळीत करावा, पाणी पुरवठ्यातील तांत्रिक दोषांचा तातडीने शोध घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणारे निवेदन हैदर नगर येथील रहिवाश्यानी आजरा नगर पंचायतीला दिले आहे.
मागील दोन अडीच वर्षापासून नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना घेऊन आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती रस्त्यावर उतरून आंदोलने करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम चोखपणे करीत आहे. त्यामुळे अन्याय निवारण समितीवर लोकांचा भरवसा आणि विश्वास वाढत चालला आहे. याच अनुषंगाने हैदरनगर येथील रहिवाश्यानी आपल्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायतीला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतीमार्फत हैदरनगर वसाहतीमध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून रहिवाशीयांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील तांत्रिक दोषांचा तातडीने शोध घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून योग्य दाबाने व नियमित पाणी पुरवठा करावा तसेच हैदरनगर परिसरात लवकरच नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते त्यानुसार पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत व दोषमुक्त झालेनंतरच रस्त्यांची कामे हाती घेणेत यावीत जेणेकरून नंतर पाणीपुरवठ्यातील दुरुस्तीच्या कारणास्तव नव्याने केलेले रस्ते उकरून बेकार करण्याची वेळ येणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून तातडीने पाणी पुरवठा योग्य व सुरळीत करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर परशुराम बामणे (भाऊजी), जावेदभाई पठाण, तातोबा आजगेकर, दिनकर जाधव, मदन तानवडे, मिनिन डिसोझा, गौरव देशपांडे, रौनक कारेकर, सुभाष कांबळे, मुनवर भडगावकर, डॉ. मुनीर मुल्ला, शरफूद्दीन पठाण, रशीद इंचनाळकर, समीउल्ला नेसरीकर, मुस्ताक भडगावकर, मोहसीन शेख, जुबेर भडगावकर, अबूभाई पठाण आदींच्या सह्या आहेत.
हैदरनगरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा-अन्याय निवारण समितीचे निवेदन
|