बातम्या
विवाह नोंदणीसाठी नवविवाहितांना पाच झाडे लावणे बंधनकारक
By nisha patil - 9/9/2025 12:40:45 PM
Share This News:
जरंडी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय : विवाह नोंदणीसाठी नवविवाहितांना पाच झाडे लावणे बंधनकारक
सोंयगाव (छत्रपती संभाजीनगर) : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जरंडी ग्रामपंचायतीने एक आगळावेगळे पाऊल उचलले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत काही महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सर्वप्रथम, गावातील नवविवाहित जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाच झाडे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर केल्यानंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. हा ठराव सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजूर झाला.
ग्रामस्थांमध्ये देशभक्तीची भावना वाढविण्यासाठी दररोज सकाळी ९ वाजता ग्रामपंचायतीच्या स्पीकरवर राष्ट्रगीत वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा ठराव चर्चेला आला. दररोज सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीच्या सायरननंतर गावातील सर्व टीव्ही व मोबाइल बंद ठेवणे आवश्यक असेल. यामुळे कुटुंबांमध्ये संवाद वाढेल आणि समाजात एकात्मता निर्माण होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी रोजगार हमी योजना, कृषी योजना, पंचायत राज अभियान आणि गाव विकास या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.
विवाह नोंदणीसाठी नवविवाहितांना पाच झाडे लावणे बंधनकारक
|