शैक्षणिक

“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” प्राचार्य डॉ. जी. पी. माळी

The public truth of flowers


By Administrator - 11/4/2026 4:10:58 PM
Share This News:



“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” प्राचार्य डॉ. जी. पी. माळी

कोल्हापूर, दिनांक- ११ एप्रिल, २०२६ महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारलेला आहे. तो आचरण्यास विधायक व सुलभ आहे. धार्मिक सहिष्णूता, मानवी प्रतिष्ठा  व मानवी समानता ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठीच जोतीरावांनी या सार्वजनिक सत्यधर्माची निर्मिती केली होती. फुलेंचा हा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ म्हणजे मानवी मुक्तीचा जाहीरनामा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने सुरु असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “महात्मा फुले यांचा मानवतावादी सत्यधर्म” या विषयावरील व्याखानामध्ये बोलत होते. यावेळी प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक व स्वागत डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी केले. 
    
पुढे बोलताना डॉ. माळी म्हणाले, सत्यशोधक समाज ते सार्वजनिक सत्यधर्म हा फुलेंच्या जीवन व कार्याचा प्रवास आहे. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये ‘सत्यधर्माची’ मुलभूत मांडणी केली आहे. ‘सत्य’ हेच जोतीरावांच्या धर्माचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे विचार व कार्य समजून घेण्यासाठी वृत्तपत्रातील एखाद्या लेखावर अवलंबून न राहता फुलेंनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचून समजून घेतले पाहिजेत. महात्मा फुलेंनी त्यांच्या सत्यधर्मामध्ये ईश्वर हा निर्मिकाच्या स्वरूपात स्वीकारला परंतु; काल्पोकाल्पित देवता व त्यांची मूर्तीपूजा, व्रतवैकल्य, प्रारब्ध, संचित, स्वर्ग-नर्क, सत्यनारायण, नशीब, यासारख्या थोतांड गोष्टी नाकारल्या. त्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण व बुद्धीप्रमाण्यावाद स्वीकारला व तो बुद्धीप्रमाण्यावाद त्यांनी स्वकृतीतून आचरणात आणला. फुलें ब्राह्मण्यावर आधारित चातुर्वर्ण्य व त्याद्वारे होणारे शोषण आणि छळवणूक याच्या विरोधी होते. उस्मान शेख यांनी जोतीरावांना प्रौढांची शाळा सुरु करण्यासाठी जागा दिलेली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर होवाळ यांनी केले.
    
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. एम. एस. देशमुख म्हणाले, महात्मा फुले हे समतेचे अग्रदूत होते. त्यांनी समाजातील सामाजिक व आर्थिक शोषणाविरुद्ध महत्त्वपूर्ण कार्य केले. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवून त्यांची मुक्ती झाली पाहिजे असा आग्रह धरला. यावेळी प्रा. डॉ. प्रल्हाद माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे आभार डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी मानले.
    
या व्याख्यानास प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, डॉ. चेतना सोनकांबळे, प्रा. अविनाश भाले, आनंदराव खामकर, डॉ. आर. एम. गरुड, डॉ. एम. के. भानारकर, प्रकाश श्रावस्ती, दीपक शिंदे, डॉ. किशोर खिलारे, गणेश कांबळे, प्रा. प्रियांका जाधववर, मिलिंद सुरुळकर, उदय पोवार, सुशांत पंडित, विक्रम कांबळे इत्यादींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” प्राचार्य डॉ. जी. पी. माळी
Total Views: 14