बातम्या
"जनसेवेच्या मंदिरात सामान्य जनतेची धास्ती का?" – राजू शेट्टी यांचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
By nisha patil - 5/16/2025 3:08:14 PM
Share This News:
"जनसेवेच्या मंदिरात सामान्य जनतेची धास्ती का?" – राजू शेट्टी यांचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेच्या नावाखाली सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मंत्रालय म्हणजे जनतेच्या सेवेसाठी उभारलेले "जनसेवेचे मंदिर" असताना, सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी होणाऱ्या त्रासाला त्यांनी "षडयंत्र की अपयश?" असा सवाल करत सरकारच्या "गुड गव्हर्नन्स"च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शेट्टी म्हणाले, “शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला ओळखपत्र तपासणी, स्कॅनिंग, पुन्हा पुन्हा रांगा, आणि विभागागणिक स्कॅनरचा सामना करावा लागतो. त्याच्या चेहऱ्यावरची विवंचना आणि हातातील कागदपत्रं कोणत्याही शासनाला अंतर्मुख करणारी आहेत."
“बडे उद्योगपती, दलाल मंत्रालयात सहज प्रवेश करतात, त्यांना रेड कार्पेट, आणि सामान्य माणसासाठी दांडके – हे सरकार कोणासाठी चालते आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी जर खरच सामान्य माणसाच्या हिताचे धोरण राबवायचे असेल, तर मंत्रालयातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करावी, फेस स्कॅनरची व्यवस्था गेटवरच व्हावी, आणि सर्व विभागांमध्ये समन्वय साधत कार्यपद्धती सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली.
"जनसेवेच्या मंदिरात सामान्य जनतेची धास्ती का?" – राजू शेट्टी यांचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
|